मे महिन्यातील उन्हाच्या झळा वाढण्याबरोबरच कोरोना रुग्णाची संख्या जशी वाढत आहे. तशीच महाराष्ट्राच्या राजकारण देखील चांगलेच तापू लागले आहे. राज्यपालांच्या समोरची खासदार संजय राऊत यांची नम्रता, अजित पवारांना डॉक्टर म्हणून घेतलेला चिमटा आणि मंत्री कपातीची घोषणा.. आणि पृथ्वीराज बाबांचे हे सरकार आपलं नसल्याची क्लिप या बर्याच बाबी राजकीय विचारवंताना विचारच करायला लावणार्या बाबी आहेत. याकडे कोणीच दुर्लक्ष करुन चालणार नाही.
महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारखे महामारीचे संकट आले. या संकटातून प्रयत्न काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करीत आहेत. त्यांना अन्य मंत्र्यांची साथ किती मिळत आहे. याविषयी कोणीच काही न बोलले बरे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे टीव्हीसमोर येऊन देशातील नागरिकांना आवाहन करीत असतात. या आवाहनाला जनता देखील तेवढाच प्रतिसाद देताना दिसत आहे. महाआघाडीचे सरकार आल्यानंतर ते समन्वयानी चालविण्यासाठी काही शरद पवार यांनी एक नियमावली ठरवली आहे. ती नियमावली कोणीच तोडायची नाही. असे ठरलेले असताना महाआघाडीतील नेत्यांची वक्तव्य पहायली तर कुछ तो गडबड है.. असेच वाटत आहे. कोणीच कोणतीच संधी सोडताना दिसत नसल्याचे वास्तव पहायला मिळत आहे.
पुण्यात एका वर्तमानपत्राने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. अजित पवार हे आमच्या सरकारची स्टेपनी आहेत. यामुळे आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येत नाही, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या गाडीचे नट काढण्याचे काम केले. महाविकास आघाडीची गाडी सुसाट निघाली आहे. त्यामुळे तिला थांबवणं शक्य नाही, असंही राऊत म्हणाले होते. मागील दोन दिवसापूर्वी पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्मार्टसिटी या ठिकाणी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या देशभरात कोरोना सारखा महामारी रोग सुरू आहे. यामुळे बूम आपल्याजवळ आणू नका अशी टिपणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलण्याच टाळलं. माञ मीडियाशी कधी बोलणार, असं विचारल्यावर त्यांनी कोरोना संपल्यावर असं जुजबी उत्तर दिलं. तर दोन मिनिट बोला असं म्हटल्यावर, त्यांनी जो माणूस महिना महिना इथं येत नाही. तो काय बोलणार, अशी विरोधकांच्या आरोपावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली.
स्थिती कंट्रोल मध्ये आहे का असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर रोज प्रेस घेऊन सांगतात असे सांगितले. पत्रकारांनी आपल्यापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तो बुम जवळ आणू नका त्यानं कोरोना होतो, अशी टिप्पणी करत ते निघून गेले. याच बूमचा विषयी पकडून खासदार संजय राऊत यांनी संधी साधली ती अजित पवार यांच्यावरच.. राऊत यांचा हजरजबाबीपणा कधीच लपून राहत नाही. यामध्ये अजित पवारही हुकत नाहीत. याचा प्रत्यय अनेक वेळा येत आहे.
राज्यपाल यांच्या भेटीनंतर संजय राऊत पत्रकारांना भेटण्यासाठी आले. यावेळी त्यांनी सांगितले अजित पवार काल म्हणाले आहे. तो बूम लांब ठेवा.. त्यांने करोना होतो असं डॉक्टर अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यातही डॉक्टर या शब्दावर अधिकच भर होता. राऊत असे का बोलले असतील.. हे राजकीय जाणकरांना चांगलेच समजले असेल. राज्यपालांच्या भेटीनंतरचा अजित पवारांना काढलेला चिमटा राजकीय विचारवंताना विचार करायला लावणार आहे. याच बरेाबर जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते, ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेर्या यांच्यातील शांतता हतबलताच दाखवत आहे, हे असेच सुरु राहिले, तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, असे भाकित राऊत यांनी वर्तविले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेनेचे सरकार असल्याची भावना काँग्रेस नेत्यांच्या मनात असल्याचं चित्र आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यासोबत कथित संभाषणाची ध्वनिफीतही समोर आली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीमधील दूरध्वनीवरील संवाद यामध्ये ऐकू येतो. स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने त्या व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता.
मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे होईल असा वाटत नाही. निधी सगळा परत घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांचे समोरच्या व्यक्तीला सांगणे होते. तुमचं नाव मोठं आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे असं कार्यकर्ता म्हणाला असता जेव्हा होती संधी, तेव्हा दिली नाही अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी खदखद व्यक्त केल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतं. या सर्वबाबी राजकीय विचारवंताना विचार करायला भागच पाडतात.
--
Digambar Darade