‘एकच गट्टी राजू शेट्टी’ हा सर्वसामान्य माणसाचा आवाज भाजपाने दाबला असला तरी गोविंद बागेतील ‘पॉवरफूल’ ताकद त्यांच्यामागे उभी राहिली. एकेकाळी गोविंद बागेतील बंगल्यासमोर आंदोलन करणारे खासदार राजू शेट्टी आता त्याच बंगल्यातील जादूने आमदार होत आहेत. शरद पवार यांनी निवडणूकीच्या वेळी दिलेला शब्द खरा ठरत आहे. दिलेल्या शब्दानुसार राजू शेट्टी यांना आमदार होण्याचा मान मिळत आहे.
बारामतीमध्ये ज्या गोविंदबागेसमोर तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदासाठी तीव्र आंदोलन केले. त्याच ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत स्नेहभोजन घेत आमदारकी संबंधी चर्चा झाली. पाठीमागे युतीचे सरकार आण्यामध्ये राजू शेट्टींचा मोठा वाटा होता. पंधरावर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊसदर आणि दूधाच्या आंदोलनावरुन त्यांनी ‘सळो की पळो’ केले होते. सत्ते आलेल्या युती सरकारने शेट्टी यांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांचे जवळचे निकटवर्तीय सदाभाऊ खोत यांना मंत्री केले. शेट्टींचा ‘स्वाभीमान’ दुखवला. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ धरली.
निवडणूकींच्या दरम्यान शरद पवारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकीची ऑफर दिली होती. दोन्ही काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतर ‘स्वाभिमानी’कडे दुर्लक्ष केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता राज्यपाल नियुक्त म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टींना आमदारकी द्यायचा निर्णय घेतल्याने ही नाराजी दूर होणार आहे. मागील काही दिवसांच्यापूर्वी राजू शेट्टी यांच्या मातोश्री आजारी असल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील यांनी शेट्टींच्या घरी भेट दिली. याच दरम्यान राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यात बंदखोलीमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे या विषयावर चर्चा झाली.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्या पासून फारकत घेतल्यानंतर ते भाजपकडे झुकले होते. भाजपने त्यांना विधान परिषदेमध्ये संधी दिली होती. मात्र तेव्हा त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी न देता भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज भरायला लावला होता. यामुळे तांत्रिकदृष्ट्या सभागृहांमध्ये खोत हे भाजपचे आमदार म्हणूनच होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेट्टी यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवल्यावर शेट्टी हे स्वाभिमानीचे उमेदवार असणार? की राष्ट्रवादीचे? असा मुद्दा उपस्थित झाला होता.
राजू शेट्टी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता. इ.स.2009 च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना 95 हजार 60 मतांनी पराभूत करून धक्का दिला होता. हा पराभव त्यावेळी पवारांच्या जिव्हारी लागला होता. नाराज शेट्टींची अडचण ओळखली आणि पवारांनी त्यांना जवळ केले. मी शत्रूला (विरोधकांना) संपवतो. जेव्हा मी त्यालाच माझा मित्र बनवतो. हे अब्राहम लिंकनचे वाक्य शरद पवारांनी खरे करुन दाखविले आहे.